क्रांतिसिंह नाना पाटील आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम


क्रांतीसिंह नाना पाटील यांचे सहकारी तुफान सेनेचे प्रमुख क्रांतिअग्रणी जी . डी . बापू लाड यांचे चिरंजीव अॅड प्रकाशभाऊ लाड यांच्या निमंत्रणावरून या वर्षीचा दहावीचा पहिला सेमिनार कुंडल येथील प्रतिनिधी हायस्कूल व चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे आज संपन्न झाले ...  अरूण अण्णा लाड व प्रकाशभाऊंच्या हस्ते सन्मान , आदरतिथ्य भारावून टाकणारे ...
इतक्या दूरवरून कुंडलला जाण्याचे कारण म्हणजे बापूंचा हैदराबाद  मुक्तिसंग्रामातील सहभाग ...  आपणासही  बापूंचे योगदान ज्ञात व्हावे म्हणून हे टिपण ...




क्रांतिसिंह नाना पाटील  आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम


भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या प्रतिसरकारला अनन्यसाधारण महत्त्व आहे.१९४२ च्या लढयात सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना झाली.कुंडल येथील क्रांतीअग्रणी जी.डी.ऊर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातूनकायदा व सुव्यवस्था टिकवणे,गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रतिसरकारच्या माध्यमातून केली जात.सावकारशाहीला विरोध,दारूबंदी,साक्षरता प्रसार,जातीभेद निर्मुलन यासारखी कामे केली गेली.
भारताला स्वातंत्र्य मिळाले पण हैदराबाद संस्थान पारतंत्र्यात होते.या संस्थानात निजामाची जुलमी सत्ता होती. कासीम रझवी च्या नेतृत्वाखालील रझाकार संघटनेने संस्थानात धुमाकूळ घातला होता.अशातच एका घटना घडली ....
गोविंदराव पानसरे हे स्टेट कॉंग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते व मुधोळ तालुक्याचे संघटक होते.या भागात गोविंदराव करत असलेले कार्य रझाकारांना आवडणे शक्यच नव्हते.गोविंदरावांनी कुंडलवाडी येथे केलेले भाषण सरकारला आक्षेपार्ह वाटले.त्यामुळे त्यांना अटक झाली.जामीन मिळाला नाही.शेवटी २१ ऑक्टोबर ला त्यांना जामीन दिला गेला.सायंकाळी ते पुंडलिकराव पाटील व इतर कार्यकर्त्यांसोबत बैलगाडीतून बिलोलीला  जात असताना रझाकारांनी अर्जापूर जवळ गाठून त्यांचा खून केला गेला. गोविंदराव पानसरे हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्टेट कॉंग्रेसचे पहिले हुतात्मा होत.गांधीवादी गोविंदरावांच्या बलिदानाने या भागातील जनता फार मोठया प्रमाणात मुक्ती लढयात सामील झाली.नांदेड जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते निर्भीडपणे निजामी राजवटीला आव्हान देऊ लागले.यात क्रांतिसिंह नाना पाटील  व क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड  आघाडीवर होते.नुकतेच ते भूमिगत अवस्थेतून बाहेर आले होते.त्यांनी मराठवाडयाच्या सीमाभागात झंझावाती दौरा सुरु केला. यांनी उघडपणे निजामाच्या गाड्यातून जाणारा खजिना लुटा !बंड करा ! असे आवाहन करीत.सरहदी वरील त्यांच्या भाषणाला हजारोंच्या संख्येने लोक येत.पुढे त्यांच्या प्रेरणेतून अनेक ठिकाणी पोलीस ठाणी जाळली जाऊ लागली.रझाकार केंद्रावर हल्ले झाले.सातारच्या प्रतिसरकारच्या धर्तीवर ग्रामराज्ये स्थापन झाली.




मराठवाडयातील कित्येक खेडयातून दळण दळताना माता भगिनी ओवी म्हणत ..
               पहिली माझी ओवी ग | क्रांतिसिंह नानाला ||
               धाक देऊनी पळविला | तांबड्या ग सायबाला ||
               आयाबाया विनविती | धडा दे रे रझवीला ||
खरोखरच मराठवाडयातील जनतेला  क्रांतिसिंह नाना पाटील आणि क्रांतीअग्रणी बापू लाड यांनी  कायम प्रेरित केले. बापूंनी कुंडल येथील आपले निवडक पाचशे सैनिक घेऊन हैदराबाद संस्थान गाठलं . निलंग्याचे श्रीपतराव  साळुंके, ज्ञानेश्वर पाटील , उद्धवराव पाटील , पंडीतराव पाटील  यांना सोबत घेतले ... बार्शी कॅम्पवर  कार्ये चालू ठेवले.  इले गावात यांना मोठा विजय मिळाला तिथे प्रतिसत्तेची स्थापना केली.  यांच्या प्रेरणेतून निजामी राजवट उलथवून टाकणारी गावे पुढीलप्रमाणे .............

निजामी सत्ता झुगारणारी गावे

हैदराबाद मुक्तिसंग्रामात अनेक गावे निजामी सत्ता झुगारून स्वातंत्र्य झाली.हैदराबाद स्टेट कॉंग्रेसच्या आदेशाप्रमाणे कार्यक्रम आखला गेला व ज्या आठ खेडयांनी आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले.ही खेडी औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर तालुका व  अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव तालुक्यातील पण निजामी हद्दीतील होती.ती खेडी पुढीलप्रमाणे १)गोवर्धन २) सराळा ३)महांकाळ - वाडगाव ४)भामाठाण ५)भालगाव ६)चांदेगाव ७)डाकपिंपळगाव ८) नागमठाण
उस्मानाबाद जिल्हयातील मुक्तापूर स्वराज्य  
उस्मानाबाद व  सोलापूर या दोन   जिल्हयाच्या मानेगाव ,जांबगावदरम्यान निजामी संस्थानातील ६५ गावे होती.१५ ऑगस्ट १९४८ हा स्वातंत्र्यदिन या टापूत राष्ट्रध्वज उभारून साजरा केला गेला.६५ गावांचा एक तालुका घोषित करून याचे नाव ‘मुक्तापूर स्वराज्य’असे ठेवण्यात आले व हा भाग पोलीस कारवाईपर्यंत स्वातंत्र्य सैनिकांच्याच ताब्यात होता.

याशिवाय परतीयाला ९ , इटगी १३,रायचूर १५,गुलबर्गा १७,वरंगल १२,परभणी १००,नांदेड २४,औरंगाबाद १९ आणि उस्मानाबाद ५५ अशी एकूण २७४ गावे निजामी जोखडातून मुक्त करण्यात आली.
                         अजून एक घटना ............
४ डिसेंबर १९४७ रोजी सायंकाळी निजामाच्या गाडीवर बॉम्ब टाकून त्याला संपवण्याचा प्रयत्न नारायणराव पवार व त्यांच्या साथीदारांनी केला.सायंकाळी ते निजामाच्या गाडीची वाट पाहत थांबले ... सुरुवातीला नारायणराव हात बॉम्ब घेऊन उभे राहिले व पुढे काही अंतरावर जगदीश आर्य व गंगाराम पालमकोल उभे राहिले.किंग कोठी तून गाडी निघाली नारायणराव अगोदरच सावध होते गाडी जवळ येताच नारायणरावांनी बॉम्ब फेकला पण दुर्दैवाने तो बॉम्ब खिडकीवर आदळून बाहेर पडला व फुटला इतक्यात पोलिसांनी झडप घालून नारायणरावांना पकडले. गाडीच्या ड्रायव्हरने गाडी मागे वळवली व परत किंग कोठीत नेली त्यामुळे पुढे थांबलेल्या दोघांना काहीच करता आले नाही .नारायणरावांना खूप मार बसला पण त्यांनी आपल्या साथीदारांची नावे सांगितली नाहीत.पुढे या सर्वांवर खटला चालून नारायणरावांना फाशीची शिक्षा झाली. सुदैवाने लवकरच पोलीस कारवाई झाली.या वेळीही त्यांना तुरुंगातून सुटका झाली नाही.पण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्ती नंतर ते तुरुंगातून सुटले. जरी ही योजना यशस्वी झाली नाही तरी याचे श्रेय क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांती अग्रणी  बापू लाड यांना पण द्यावे लागते कारण या तरुणांना बॉम्ब पुरवण्याचे कार्य त्यांनी केले होते ... हे आम्ही कधीही विसरणार नाही ... क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतीअग्रणी  बापू लाड , नारायणराव पवार व त्यांच्या सर्व साथीदारांना त्रिवार वंदन ..........
                                                                          भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                                          लातूर





No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.