पावसात राजगड - (अवर्णनीय आणि अविस्मरणीय )




पावसात राजगड - (अवर्णनीय आणि अविस्मरणीय )


                   (१ सप्टेंबर २०१९ ला केलेल्या राजगडाच्या पावसातील ट्रेकचा धावता आढावा..)     
            चौथीला असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पहिल्यांदा ऐकला.शिवनेरी,  राजगड ही किल्ले पाहण्याची कल्पना त्यावेळी काही आली नसावी. उदगीरला असताना विवेक नागुरे या प्रिय मित्राचे घर चौबाऱ्या जवळ असल्यामुळे तिकडे गेलो की किल्ल्यातच फिरायला जायचो ...आठवड्यातून किमान  एक वेळा तरी ...पण 
       एम ए ला पुण्याला गेलो आणि खऱ्या  अर्थाने माझ्या दुर्ग भटकंतीला सुरुवात झाली.शिवनेरी, सिंहगड, लोहगड, यांच्यासह पुण्यापासून दूर असलेले सुधागड, प्रतापगड, अजिंक्यतारा, अलिबाग, मुरुड जंजिरा, रायगड,पन्हाळा  असे अनेक किल्ले पाहता आले पुढे विविध वेळी  कधीतरी दौलताबाद, नळदुर्ग , कंधार, औसा, परंडा या मराठवाडयातील किल्यांसह   आग्र्याचा किल्ला , दिल्लीतील लाल किल्ला, जयपूरचा  आमेर गड, हैदराबादचा गोवळकोंडा  असे अनेक किल्ले पाहून झाले. पण स्वराज्याची पहिली राजधानी मात्र पाहता येत नव्हती. अनेक मित्र हा दुर्ग चढाईला अवघड आहे म्हणून टाळत असत. मात्र मला तर राजगड अनुभवायचा होता ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांनी पंचवीस वर्ष वास्तव्य केले त्या दुर्गाचे दर्शन माझ्यासाठी अनिवार्य होतं. अनेकदा Plane  झाले पण success rate zero. एकदा तर किल्ल्यापर्यंत गेलो ही  पण खूप उशीर झाल्यामुळे अर्धवट परतावं लागलं होतं .
            दोन दिवस पुण्यात होतो ... जोडून रविवार आला म्हणून राजगडाला जाऊ  यात असे  वाटले  ..  खूप मित्रांना विचारलं पण कोणीही तयार होईना.  मग आपल्या नेहमीच्या पद्धतीने म्हटलं ... चल अकेला .... मागचा अनुभव असल्यामुळे सकाळी लवकरच निघालो ... गाडीची व्यवस्था झाली ... सकाळी सातलाच सातारा रोडला लागलो ... तसं राजगडाला जायला खूप रस्ते आहेत. पुण्याहून सातारा हायवेने  नसरापूरला जावे तिथून उजवीकडे वळून नसरापूर गावातून  राजगडाच्या दिशेने निघावे पुढे   मार्गासनी फाटा लागतो. तिथून डावीकडे पाली गावी जावं .. पाली गावातून वरच्या माळावर यावं ... येथून बऱ्यापैकी पायवाट आहे. .. निसरडी वाट .. त्यात पाऊस त्यामुळे सुरूवातीच कळले आज ज्याम मज्जा येणार ...हातातील काठीचा आधार घेउन Balance सांभाळत निघालो. मध्येच पुण्यातील आय टी कंपनीतला एक ग्रुप भेटला.  अर्ध्या वाटेत त्यातील बहुतांश जण बसले .जोधपुरचा राकेश नावाचा एक इंजिनियर मात्र माझ्यासोबत चालू लागला. मध्येच पायऱ्या मग पाली दरवाजा ... गडावर जायचा हा सर्वात सुरक्षित मार्ग .. राकेश व मी   बऱ्यापैकी दमछाक  होत पद्मावती माचीवर पोहचलो ......

             इ.स. १६४५ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा ताब्यात घेतला .... तिथे बावीस हंडे सोन्याच्या मोहरा आढळल्या ... त्यातून मुरूंबदेवाच्या डोंगरावर अजोड , अजिंक्य असा राजगड बांधवून घेतला ..४५७४ फूट उंचावर स्वराज्याची पहिली राजधानी उभी राहिली ...१६४७ ते १६७२ अशी पंचवीस वर्षे छत्रपती शिवरायांचे वास्तव या गडावर होते ...
पद्मावती माचीवर सदर, रावाड्याचे अवशेष बघत पद्मावती मंदिरात विसावलो येथे कोल्हापूरचे अभिषेक व ओंकार भेटले ... मग मस्त कंपनी जमली , सईबाईसाहेबांची समाधी , पाण्याचे टाके, रामेश्वर मंदिर, पद्मावती तलाव बघत बालेकिल्ल्याच्या दिशेने  चालते झालो ... अवघ्या जगात राजगडाच्या बालेकिल्ल्यासारखा उत्कृष्ट बालेकिल्ला अन्य कोणत्याही किल्ल्याला नाही असे वाचले होते त्यामुळे बालेकिल्ला पाहिल्याशिवाय समाधान मिळणार नव्हत. एव्हाना पावसाची रिपरिप वाढली होती ... रेनकोट असूनही चिंब भिजलो पण आता माघार नाही, स्वतःलाच बजावलं ....राजगडाचा विस्तार मोठा आहे ... पद्मावती माची, . सुवेळा माची, संजीवनी माची  आणि बालेकिल्ला... एका दिवसात पूर्ण किल्ला पाहणं अवघड  आहे ... म्हणून अगोदर बालेकिल्ला ... जोधपुर वाला राकेश खूप थकला होता त्यामुळे आम्ही त्यास जास्त आग्रह केला नाही.मी, अभिषेक व ओंकार बालेकिल्ल्याकडे निघालो. बालेकिल्ल्याचे सामर्थ्य त्याच्या दुर्गमपणात आहे. प्रचंड दमछाक करणारा आणि चढाईला कठिण ... काही ठिकाणी तर केवळ हातावर भार देऊन शरीर उचलावे लागतं.पण एकमेकांना आधार देत बालेकिल्ल्यावर पोहाचलो...
  महादरवाज्यात पोहचल्यानंतर मनाला जो आनंद झाला त्याचे वर्णन काय करावे ... येथेही सदर , राजवाडा व इतर बांधकामाचे अवशेष आढळतात ..... मागच्या बाजूला अर्धचंद्राकृती चंद्रतळे आहे.येथेच सोबत आणलेलं जेवण केलो ... व परतीला लागलो ... पाऊस काही थांबायला तयार नव्हता आणि आम्हीही ... थोडा वेळ संजीवनी माचीवर भटकलो. पावसाळ्यात गडदर्शन करण तसं पाहिले तर फार काळजीपूर्वक करावं लागते.पण गडभर पसरलेली हिरवाई आणि त्यात उगवलेली विविध रानफुलं पाहायची असतील तर पावसाळ्याला पर्याय नाही ......
 ...
 एव्हाना चार वाजले होते .. आता परतीचा प्रवास सुरू केला ... ते दोघे गुंजवणे मार्गे आले होते त्यामुळे एकटयाच प्रवास परत सुरू झाला .. पावसाची संततधार , उंचावून कोसळणारे धबधबे , प्रचंड ढग, मध्येच पक्षांची किलबिलाट  सगळ काही स्वप्नवत , परतताना वेग वाढवला त्यामुळे तासभरात पायथ्याला पोहचलो .... पाच वाजता पुण्याच्या दिशेने निघालो ... भाताची हिरवीगार शेतं, तुडुंब वाहणारं पाणी,  .... शरीर थकलं पण मन ताजंतवानं झालं ... म्हणूनच अवर्णनीय आणि अविस्मरणीय राजगड ...
      
 भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
Our Official  Website - www.bhausahebumate.com
·      Like, share and subscribe our YouTube Channel –Bhausaheb Umate
·       Download our App. From Play store – Bhausaheb Umate
-------------------------------------------------------------------------------------------


No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.